शिवसेना : हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व !!!

शिवसेनेच्या स्थापनेमागील मुख्य हेतू मराठी तरुणांना न्याय मिळवून देणे हा होता.बाळासाहेबांची 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' यावर श्रद्धा होती. शिवसेनेने हिंदुत्त्वाशी निगडीत असणारे अनेक प्रश्न सुरुवातीच्या काळात मांडले.पण गेल्या शतकातल्या आठव्या दशकामधे शिवसेनेने मराठी अस्मितेच्या पुढे अजून एक पाऊल टाकून कट्टर हिंदुत्त्वाची भूमिका घेतली.शिवसेनेने हिंदुत्त्व आणि राष्ट्रवादाची कास धरुन देशातील हिंदूंवरच्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढा द्यायला सुरुवात केली. शिवसेनेने सीमाप्रांतात राहणाऱ्या हिदूंचे जीवन सुरक्षित केले.
प्रबोधनकार ठाकरे ह्यांचा हिंदुत्त्वाविषयी योजनाबद्ध आणि अभ्यासपूर्ण दृष्टीकोन होता.त्यांचे हिंदुत्त्व त्याग आणि कर्म कांडापेक्षा राष्ट्रीय सदगुणांवर जास्त आधारित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीचे ते पुरस्कर्ते होते.बाळासाहेबांना ह्या विचारसरणीचा उदात्त वारसा प्रबोधनकारांकडूनच मिळाला.
शिवसेना एक हिंदुत्त्ववादी संघटना असल्यामुळे बाळासाहेबांनी कधीच हिंदुत्त्वविरोधी भावना पसरविणाऱ्या घटकांशी तडजोड स्वीकारली नाही. हिंदूंवर अन्याय करून हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवणारे बाळासाहेबांचे जे ठाम तडफदार नेतृत्व उदयाला येत होते , ते पाहून हिंदूंना खूपच दिलासा मिळाला होता. हिंदुहृदयसम्राटांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उल्लेखनीय बदल घडविले.त्यांच्या काही वादग्रस्त निर्णयांमुळे देशाची राजकीय परिस्थिती बदलली.
‘शिवसेना-हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या विषयावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेले विचार…
शिवसेनेच्या स्थापनेची एखादी वीट जरी तपासून पाहिली तरी तिला हिंदुत्वाचा सुगंध येईल. १९ जून १९६६ रोजी आम्ही मुंबापुरीत जो भगवा ध्वज फडकवला तो कोणत्या पक्षाचा ध्वज नव्हता अन् ते एखादे फडकेही नव्हते. हा भगवा ध्वज म्हणजे तीनशे वर्षांपूर्वी सिध्दी प्राप्त झालेल्या श्री समर्थ रामदासांनी शिवछत्रपतींना हिंदू धर्म प्रस्थापनार्थ दिलेला आशीर्वाद होता. तो जेव्हा आम्ही खांद्यावर घेतला तेव्हा ते शिवधनुष्य आम्हाला पेलेल किंवा नाही याबाबत आम्ही साशंक होतो. पण त्याचे ओझे जाणवण्यापूर्वी शिवसैनिकांचे हजारो हात त्या ध्वजाला लागले आणि त्यांनी तो भगवा डौलाने फडकवत ठेवला. हे सर्व आज तपशीलवार सांगण्याचे कारण एवढेच की, निवडणुका जवळ आल्याने विरोधी पक्षांचे धाबे दणाणले असून शिवसेनेला बदनाम करण्याची त्यांच्यात अहमहमिका लागली आहे. दुर्दैवाने अनेक वर्तमानपत्रांनीही निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेनेने हिंदुत्वाचे धोरण स्वीकारले आहे असा बाष्कळ सूर लावला आहे. काही जणांनी शिवसेनेने आपले मराठी धोरण सोडून मते मिळविण्यासाठी हिंदुत्वाचा बुरखा पांघरल्याचा आरोप केला आहे. अशा प्रकारे आरोप करणारे विरोधी पक्षीय आणि वृत्तपत्रे यात आम्ही फरक करू इच्छित नाही.
शिवसेनेने आपले मराठी धोरण सोडून राजकीय स्वार्थासाठी हिंदुत्वाचा स्वीकार केला आहे हा जो आरोप करण्यात येत आहे तो बिनबुडाचा आणि द्वेषमूलक आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने आपल्या धोरणामध्ये यत्किंचितही बदल केला नसून हिंदुत्वाचे शिवधनुष्य काळाचे आव्हान म्हणून आज आम्हाला उचलावे लागले आहे. तसे करताना मराठीपासून आम्ही दूर गेलो तर आम्हाला मराठी माणसांनी कधीच क्षमा केली नसती. पण तसे न घडल्याने आजही मराठी माणूस शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे. शिवाय हिंदुराष्ट्राची कल्पना ही काही नव्याने उदयाला आलेली नाही. तीनशे वर्षांपूर्वीचे शिवछत्रपतींचे ते स्वप्न अद्यापही अपुरे राहिले असून या देशातील हिंदू आजही उपेक्षित राहिले आहेत. हिंदूंसाठी कायदे केले गेले आणि सवलती मात्र अहिंदूंना देण्यात आल्या. त्यामुळे हिंदू गेली चाळीस वर्षे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करीत राहिला आहेत. हे दीर्घकाळ चालणे शक्य नव्हते. कारण कोंडलेल्या वाफेला नेहमी मार्ग हवा असतो.
आज देशात जी हिंदुत्वाची लाट आलेली आहे, ती केवळ शिवसेनेने सागरावर फुंकर मारल्याने आलेली नसून हिंदू जनतेच्या दीर्घकाळ दडपून टाकण्यात आलेल्या त्या दडपणातून एक प्रकारची उदासीनता निर्माण झाली होती. आणि आता आपल्याला कोणीच वाली राहिलेला नाही अशा प्रकारच्या भावना हिंदूंच्यात निर्माण झाली. द्विभार्या प्रतिबंधक कायद्यपासून ते कुटुंबनियोजनापर्यंत सर्व कायदे अल्पसंख्याकांच्या हितासाठी केले गेल्याने या देशात हिंदूच अल्पसंख्याक बनण्याचा धोका निर्माण झाला. मुसलमानांची संख्या आणि मस्ती एवढी वाढली की इमाम बुखारीसारखा मस्तवाल चौदा कोटी मुसलमानांना रस्त्यात उतरवून या देशातील सत्ता काबीज करण्याच्या वल्गना करू लागला. शहाबुद्दीनसारखे विषारी सर्प वेळी-अवेळी या देशाच्या सार्वभौमत्वाला जनता पक्षाचे कातडे पांघरून दंश करू लागले. या सर्व गोष्टींचा एवढा अतिरेक झाला की, या देशातील हिंदूंना एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आम्ही हिंदूंना कधी डिवचले नव्हते आणि चेतवलेही नव्हते. पाण बेचैन झालेला हिंदूच योग्य नेतृत्वाच्या शोधात होता. अशा वेळी शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
देशातील या हिंदूंच्या वेदना फक्त शिवसेनेनेच जाणल्या. हिंदूंचे ते आवाहन आव्हान म्हणून स्वीकारले. ते करताना शिवसेनेने ध्येय बदलले नाही आणि ध्वजही बदलला नाही. ध्येय-धोरणे बदलणाऱ्या पक्षांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत जनतेचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करू नये. हिंदू धर्माची झोळी हाती घेऊन आम्ही मते मागतो हा आरोप करणाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की, १९६७ सालापासून इतिहासाची पाने चाळा. ठाणे नगरपालिकेपासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत जे जे किल्ले आम्ही आमच्या सामर्थ्यावर सर केले. आज जो हिंदू एकवटला आहे, तो शिवसेनेला मतदान करण्यासाठी नव्हे, तर या देशातील हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद यांचे प्राणपणाने जतन करण्यासाठी तो एकवटला आहे आणि या देशात राष्ट्रवादाची जोपासना करायची असेल तर ती फक्त शिवसेनाच करू शकेल, असा विश्वास आज हिंदू जनतेत निर्माण झाला आहे. या देशाच्या घटनेत काहीही लिहिलेले असेल तरी आमच्या मते हा देश हिंदूंनी निर्माण केला आहे. तो हिंदूंचा आहे आणि तो हिंदूंसाठी आहे. म्हणून या हिंदुस्थानात हिंदूंचा मान गेला पाहिजे. त्यासाठी आम्ही हिंदुत्वाचा ध्वज आज नव्हे तर शिवसेनेच्या स्थापनेपासून खांद्यावर घेतला आहे.
- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे


